सोलापूर: जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा केवळ १२ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी गेल्या आठ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे कार्यालयातील संगणकीय कामे ठप्प झाली असून, ऐन उन्हाळ्यात कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीज नसल्याने पंखे आणि दिवे बंद आहेत. सोलापूरचा पारा ४० अंशांच्या वर असताना, पहिल्या मजल्यावरील कर्मचारी घामाच्या धारांमध्ये काम करत असल्याचे चित्र आहे. अंधारामुळे आणि उष्णतेमुळे कार्यालयात बसणे कठीण झाले आहे.


उत्तर सोलापूर कार्यालयाची वीज कापल्यानंतर, प्रशासनाने तात्पुरती सोय म्हणून खालच्या मजल्यावर असलेल्या दक्षिण सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयातून वीज जोडून घेतली आहे. मात्र, या एका कनेक्शनवर सर्व भार येत नसल्याने अनेक मर्यादा येत आहेत. कार्यालयातील महत्त्वाची संगणकीय कामे आणि सर्व्हर वीज नसल्याने प्रभावित झाले आहेत. तातडीच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांना बाहेरून खाजगी दुकानातून प्रिंट काढून आणाव्या लागत आहेत. यामुळे शासकीय कामाची गोपनियता आणि गती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जमिनीचे उतारे, नकाशे आणि इतर कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. “एकीकडे सरकार डिजिटल व्यवहाराच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे अवघ्या १२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाची वीज कापली जाते, ही खेदजनक बाब आहे,” अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणावर वरिष्ठ प्रशासन काय तोडगा काढते आणि ही थकबाकी भरून वीजपुरवठा कधी पूर्ववत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे










