अक्कलकोट ; समर्थ रामदास स्वामी यांच्या कालखंडात स्थापित आणि नवसाला पावणारे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ‘जय श्रीराम’, ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.सोहळ्यानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यामध्ये श्रींचा अभिषेक, महारुद्र अभिषेक, होम-हवन आणि गजलक्ष्मी पूजा करण्यात आली. दुपारच्या सत्रात श्री हनुमानाचा पाळणा होऊन गुलाल-महाआरतीचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडला. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
या जागृत देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक दाखल झाले होते. मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व शिवानंद सोलापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३० हजारांहून अधिक भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. वाढती गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सोयीसाठी दोन किलोमीटरपर्यंत शिस्तबद्ध दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती.


हे मंदिर शारीरिक व मानसिक पीडा दूर करणारे तसेच आर्थिक संकटे, नोकरी, संततीप्राप्ती आणि व्यापारवृद्धीसाठी मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून ओळखले जाते, अशी माहिती पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी दिली. मंदिर समितीच्या वतीने या निमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.
हा जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीकांत खानापुरे, सिद्राम वाघमोडे, प्रकाश मेंथे, प्रकाश सपकाळ, परमेश्वर सुतार, शांतया स्वामी, चौडप्पा सोलापुरे, श्रीमंत सवळतोट, श्रीमंत मेत्रे, मल्लू पाटील, बिराप्पा पुजारी, हाजीमलंग माने, मल्लू मेत्रे, श्रीशैल कुंभार, शिवानंद सोलापुरे यांच्यासह ग्रामस्थांनी आणि समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले










