सोलापूर :- नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटनक्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण हेातील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडींग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते.



सोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असतांना विमानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विमानतळ नसल्याने पर्यटनाच्यादृष्टीने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, विमानतळाचे नुतनीकरण करण्यात आले.

विमानसेवेचे महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने आरसीएससारखी योजना सुरू केली. राज्य सकरकारने सोलापूरसाठी या योजनेअंतर्गत विमानसेवेतील तुट भरून काढण्याचे मान्य केले. आरसीएसच्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







