सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील माजी आमदारांनी बुधवारी सकाळी मुंबई येथील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर राजन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना, अजित पवार यांनी आपल्या सोबत लबाड माणसं ठेवली. पक्षात मान राहिला नाही. त्यांच्यामुळे आम्हाला पक्ष सोडावा, लागत असल्याचा आरोप मुंबई येथे केला होता. दरम्यान, त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजन पाटील तसेच माजी आमदार यशवंत माने यांच्यावर देखील घणाघात हल्ला केला. राजन पाटील आणि यशवंत माने यांना मोहोळ तालुक्याने नाकारले आहे. अशा विद्वान महापुरुषांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आहे. शिव्यांची लाखोळी वाहणाऱ्या विद्वानांना राजन पाटलांना भाजपने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्राचार्य करावे. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपचे काय होईल, याची मला भीती वाटत असल्याचा खोचक टोला देखील उमेश पाटील यांनी यावेळी लगावला.
पुढे ते म्हणाले, भाजपने आपल्या पक्षात महापुरुष घेतला आहे. तब्बल चार वर्षांपासून त्यांचे भाजप प्रवेशाचे प्रयत्न सुरू होते. आमदार सचिन कल्याणशेट्टीमुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला आज मुहूर्त मिळाला. त्यांच्यासोबत माजी आमदार यशवंत माने यांनी देखील भाजपची वाट धरली.
माने हे इंदापूरचे व्यावसायिक आहेत. माने यांना त्यांच्याच इंदापूर तालुक्यात फारसे महत्व नाही. आम्ही त्यांना आमदार म्हणून निवडून आणल्यामुळे ते आमदार झाले. त्यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये काही कंपन्या आहेत. त्या कंपनीच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाल्याने त्याची सोडवणूक करण्यासाठी ते भाजपाध्ये प्रवेश करत आहेत. वास्तविक पाहता त्यांचे फारसे राजकीय वजन तालुक्यात किंवा जिल्ह्यात नाहीत. यशवंत माने हे ठेकेदार व्यक्ती, मोहोळ तालुक्याचा ठेका पाटील यांनी माने यांना दिला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर मोहोळ तालुका ठेकामुक्त झाला आहे. अशी सडकून टीका पाटील यांनी यशवंत माने यांच्यावर केली.
झोपेच सोंग घेणाऱ्यांना कसं उठवणार?
एकमेकांचे कार्यकर्ते ओढून घेतलेलं राज्य पाहत असतं. त्याचे लोण राज्यभर पुन्हा पसरेल. लोकांना हा प्रवेश आवडला की नाही हे निवडणुका नंतर समजेल असे उमेश पाटील म्हणाले. जायचं ज्यांनी ठरवलं आहे त्यांना थांबवन शक्यच नसतं. झोपेच सोंग घेणाऱ्यांना कसं उठवणार? असा सवाल देखील पाटील यांनी केला. चार महिने आधीच यांनी पक्ष सदस्य घेतलेलं होतं असे पाटील म्हणाले.
यशवंत माने यांना फारसं महत्व नाही, स्वतःची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नाही
केवळ दोन माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं चार माजी आमदार म्हणून गफलत केली जात आहे. यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्याचे नाहीत. ते व्यावसायिक आहेत ठेकदार आहेत. राजन पाटील याना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं महत्व नाही. स्वतःची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नाही. त्यामुळं अशा माणसाच्या प्रवेशाला महत्व देण्याची आवश्यकता नसल्याची टीका उमेश पाटील यांनी यशवंत माने यांच्यावर केली. राजन पाटलांनी इंदापूरच्या माणसाला (यशवंत माने) आमचा तालुका ठेक्याने विकला होता. आता हा तालुका ठेकेदारीतून मुक्त झाल्याची टीका देखील उमेश पाटलांनी केली.







