सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारात गेल्या सुमारे २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी उडीद, मूग, सोयाबीन, तूर आणि मका ही पिके करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीला भेगा पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मशागत करून मोठा खर्च करत विविध पिकांची पेरणी केली होती. सुरुवातीला पिकांची वाढही समाधानकारक झाली. मात्र, ऐन वाढीच्या काळातच पावसाने दीर्घकाळ पाठ फिरवल्याने पिकांना पाण्याचा तीव्र ताण जाणवू लागला. परिणामी अनेक ठिकाणी पिके सुकून करपली आहेत. पाऊस लवकर न झाल्यास उर्वरित पिकेही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कासेगाव येथील शेतकरी संभाजी गाजरे यांनी दोन एकर क्षेत्रात उडीद पिकाची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी संपूर्ण पीक करपल्याने उत्पादन मिळण्याची आशाच संपुष्टात आली. अखेर हताश झालेल्या गाजरे यांनी उभ्या उडीद पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर फिरवला. पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्चही वाया गेल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कासेगावसह परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी गाजरे यांनी केली. “पिकांसाठी केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा. अन्यथा आर्थिक संकटामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडतील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दोन एकरातील उडीद मातीमोल पावसाच्या भरवशावर दोन एकरांत उडीद घेतला. मशागत, बियाणे, खते आणि औषधांसाठी मोठा खर्च केला. मात्र, गेल्या २० दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक पूर्णपणे करपले. आता उत्पादनाची कोणतीही आशा राहिली नसल्याने उभ्या पिकावर रोटर फिरवावा लागला. प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर येऊन नुकसानीची पाहणी करावी आणि तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संभाजी गाजरे यांनी केली.