पुणे ; राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असून, त्यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या करूणा शर्मा, अभिजित बिचुकले यांच्यासह सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असे रोखठोक मत ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१०) व्यक्त केले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार मागे घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा मान राखला आहे. या निर्णयाचे पाटील यांनी स्वागत केले. एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची एक अलिखित परंपरा राहिली आहे. काँग्रेसने ही संवेदनशीलता दाखवली, मात्र रिंगणात उरलेल्या इतर उमेदवारांनी केवळ प्रसिद्धीसाठी अर्ज भरला आहे, असा दावा पाटील यांनी केला.
अजितदादांनी बारामती आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला, म्हणजेच सुनेत्रा वहिनींना बिनविरोध निवडून देणे हाच दादांना खऱ्या अर्थाने दिलेला सन्मान ठरला असता. दुर्दैवाने, काही उमेदवारांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी अर्ज मागे घेतले नाहीत, असे पाटील म्हणाले.
बारामतीमधील स्थानिक वातावरण पाहता सुनेत्रा पवार यांना सर्वच थरांतून मोठी सहानुभूती आणि पाठिंबा मिळत आहे. विरोधात असलेल्या २३ उमेदवारांकडे ना कोणते ठोस मुद्दे आहेत, ना जनाधार. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा कल स्पष्ट असून, इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम वाचवणेही कठीण जाणार असल्याचे चित्र पाटील यांनी अधोरेखित केले. ही निवडणूक केवळ औपचारिकता उरली असून, बारामतीची जनता दादांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून सुनेत्रा पवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला










