भारतातील पहिला व्यावसायिक डीएमई उत्पादन प्रकल्प सोलापुरात सुरू; ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल
सोलापूर : बालाजी अमाईन्स कंपनीने चिंचोळी एमआयडीसी येथील युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (डीएमई) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करत २० मे २०२६ पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ केला आहे. या कामगिरीमुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे. डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ आणि कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य आणि युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमईचे मिश्रण वापरले जाते. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी १ लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, “हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने बीआयएसने नुकताच नवीन आयएस कोड जारी केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करता येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी डीएमई मिश्रण उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. डीएमईच्या वापरामुळे भारताचे एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्याने उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक आणि रोड टँकरद्वारे परिवहन यांसंदर्भातील भारतीय मानकांचा अभाव असल्यामुळे पीईएसओ परवानग्या आणि इतर वैधानिक मंजुरी मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी कंपनी एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे. या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक गोविंद मेंचेकरे तसेच महाव्यवस्थापक विनय दुर्गम उपस्थित होते.













