सोलापूर : कारगिल विजय दिनानिमित्त सोलापुरात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत पार्क चौक परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन (महार रेजिमेंट) आणि शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात शहिदांच्या त्यागाला कृतज्ञतापूर्वक सलाम करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात पार्क चौकात तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रगानाने झाली.
त्यानंतर चार हुतात्म्यांच्या स्मारकासह राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास वीरपत्नी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून बिगुलच्या सुरात मानवंदना देण्यात आली. महारगानाने कार्यक्रमाची सांगता होत उपस्थितांनी देशसेवेची प्रेरणा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, कॅप्टन कमलाकर कांबळे, संजय गायकवाड, अशोक आगवणे, वीरनारी, माजी सैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचलनाचे नेतृत्व शिवपुत्र घटकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन जयनंद कांबळे यांनी केले, तर डॉ. अंगद मुके यांनी उपस्थितांचे आभार मानले.