अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंदिर परिसराचा विकास तीर्थक्षेत्र कॉरिडॉरच्या धर्तीवर करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. या निर्णयामुळे अक्कलकोटच्या विकास आराखड्याला मोठी गती मिळणार असून धार्मिक पर्यटनासह शहराच्या नागरी सुविधांमध्येही मोठा बदल होणार आहे.
या विकास आराखड्यासाठी अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी संयुक्तपणे शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. शासनाच्या मंजुरीनंतर मंदिर परिसराच्या नियोजनबद्ध विकासाची प्रक्रिया सुरू होणार आहे. विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळांची निर्मिती, पादचारी मार्ग, आरक्षित जागांचा विकास तसेच आवश्यक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी म्हाडाकडून निधीची तरतूद करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
दोन टप्प्यांत होणार विकास म्हाडाच्या संकल्पनेनुसार अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर परिसराचा विकास दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसराचा विकास करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात मंदिर ते समाधी मठ या पालखी मार्गाचे सुशोभीकरण व विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे अक्कलकोट शहराचा चेहरामोहरा बदलणार असून भाविकांसाठी आधुनिक आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात विशेष नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील विद्यमान नियोजन प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात येतील. त्यानंतर मंदिर परिसराच्या नियोजन, विकास आणि अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी म्हाडाकडे राहणार आहे.
स्वामी समर्थ नगरीला मिळणार आधुनिक रूप ; श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा विकास, पालखी मार्गाचे सुशोभीकरण, समाधी मंदिर परिसराचा विकास, शहरातील वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण, तलाव व उद्यानांचे संवर्धन तसेच भाविकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा उभारण्याचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे.
“देशभरातून अक्कलकोटला येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. या निर्णयामुळे अक्कलकोटच्या तीर्थक्षेत्र पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांचे सहकार्य लाभले.”