अक्कलकोट : अक्कलकोट येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक व सर्वसुविधांनी युक्त नवीन न्यायालयीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या हस्ते नवीन इमारतीच्या कोनशिलेचे पूजन करण्यात आले. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा (सोलापूर) यांच्यासह न्याय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
“अक्कलकोट ही माझी जन्मभूमी असल्याचा मला अभिमान आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात होत आहे. केवळ भव्य इमारत उभारणे हा उद्देश नसून, येथे उच्च दर्जाची न्यायव्यवस्था निर्माण होणे महत्त्वाचे आहे. न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी सक्षमपणे काम करून जनतेला दर्जेदार न्याय देतील,” असा विश्वास न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी व्यक्त केला. वारीच्या परंपरेतही राज्यघटनेतील समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अनुभव येतो. त्याच मूल्यांच्या आधारे न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन न्यायालयीन इमारतीमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे न्यायदान प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला यांनी या प्रकल्पामुळे अक्कलकोटच्या न्यायव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला न्यायमूर्ती एम. एम. कल्याणकर, न्यायमूर्ती आर. ए. कटारे, बार असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, सदस्य ॲड. मिलिंद थोबडे यांच्यासह न्याय क्षेत्रातील अधिकारी, वकील, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत गीत सादर करण्यात आले. व्ही. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अक्कलकोट बार असोसिएशनच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार न्यायमूर्ती एम. एम. कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
“वेळेत न्याय मिळणे हीच खरी गरज” महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे यांनी न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी वेळेत न्यायनिवाडा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सोलापूर आणि बार्शी येथील न्यायालयीन इमारतींची कामेही वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नवीन इमारतीमुळे न्यायदानाला मिळणार बळ अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीमुळे न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे अक्कलकोटमधील न्यायदान प्रक्रिया अधिक सक्षम, सुलभ आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.