मित्त शिक्षिका कविता हिंगमिरे यांचा गुरु-शिष्य परंपरेचा भावस्पर्शी लेख
सोलापूर : भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान देण्यात आले आहे. आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे गुरू हे प्रत्येकाच्या जीवनातील मार्गदर्शक असतात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जि.प. शाळा सुमित्रानगर, ता. माळशिरस येथील शिक्षिका श्रीमती कविता धन्यकुमार हिंगमिरे यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा भावस्पर्शी लेख लिहिला आहे. “ज्यांनी मला घडवले असे आई-वडील, शिक्षक आणि ज्ञात-अज्ञात सर्व गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा,” असे सांगताना त्यांनी गुरूंच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आहे.
भारतीय संस्कृतीत आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला असल्याची मान्यता आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा असून, ते शिष्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. आई-वडिलांनंतर शिक्षक हे पहिले गुरू असतात. भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. गुरूंना जात, धर्म, वय किंवा रूपाचे कोणतेही बंधन नसते. जो अज्ञान दूर करून जीवनाला योग्य दिशा देतो तोच खरा गुरू असल्याचे त्यांनी लेखातून स्पष्ट केले आहे.

“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा; गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः” या गुरुमंत्राचा उल्लेख करत त्यांनी गुरूंचे स्थान अधोरेखित केले आहे.
रामायण-महाभारत काळापासून भारतात गुरु-शिष्य परंपरेला मोठे महत्त्व आहे. श्रीकृष्ण-सुदामा, विश्वामित्र-राम, द्रोणाचार्य-अर्जुन, परशुराम-कर्ण यांसारख्या गुरु-शिष्यांच्या कथा आजही प्रेरणादायी आहेत. एकलव्याची गुरुनिष्ठा ही भारतीय संस्कृतीतील आदर्श उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे आणि शिकवणीचे आचरण करणे होय. गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवनात यश, समाधान आणि आनंद मिळतो. ज्ञान, शांती आणि आनंदाचा मार्ग दाखविणारे गुरू हे जीवनातील अमूल्य प्रसाद असल्याचे त्यांनी आपल्या लेखातून सांगितले आहे.
“गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान; जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया” या भावपूर्ण संदेशाने त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
– श्रीमती कविता धन्यकुमार हिंगमिरे
जि.प. शाळा, सुमित्रानगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर










