सोलापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिराचा रंगमंच राष्ट्रपुरुषांच्या पराक्रमाच्या पोवाड्यांनी दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर आधारित पोवाड्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या प्रारंभी समन्वयक अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक करत तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाची माहिती दिली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या नऊ शाहिरांची ओळख करून देत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवी मारुती कटकधोंड, जितेश कुलकर्णी, विजयदादा साळुंखे, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शाहिर गणेश गलांडे, शाहिरा संगीता हेमंतराजे मावळे आणि शाहिर राजेंद्र कांबळे यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून लोककलेचा आविष्कार घडविला. शाहिर राजेंद्र कांबळे यांनी सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘अफजलखान वध’ हा पोवाडा सादर केला. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने हुतात्मा स्मृती मंदिरात रोमांच निर्माण झाले.
शाहिरा प्रा. संगीता मावळे यांनी लोककलेच्या परंपरेवर आधारित पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेचा वारसा जपणाऱ्या या महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाचा बुधवारी समारोप होणार असून, रसिकांनी या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक अमोल धाबळे यांनी केले आहे