सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून काही भागात पिकांची उगवणही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत दुष्काळजन्य परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात जिल्ह्यातील सद्यस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले असतानाही अपेक्षित पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक मोठ्या संकटात सापडले असून अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. काही भागात पिकांची उगवणच झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दुष्काळामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी देशमुख यांनी केली आहे. तसेच सद्यस्थितीचा आढावा घेऊन कोणतेही कठोर निकष अथवा अटी न लावता दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी होत चालला असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.पावसाअभावी जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पशुपालकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करून जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर होत असल्याने प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.दुष्काळाचे संकट अधिक तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका घेत आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.