सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान होत असलेली बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवून महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी, अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. बालाजी सरोवर येथे झालेल्या भेटीत उपमहापौर देवकर यांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४ वरील सोलापूर ते विजापूर या १०२ किलोमीटर मार्गावर देशी वृक्षांची लागवड करण्याचा आग्रह धरला. या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणासह भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर देवकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रतीकात्मक रोपटे भेट देत “विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखा” असा संदेश दिला. गडकरी यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत कार्यवाहीचे आश्वासन दिल्याची माहिती देवकर यांनी दिली. या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक सात्विक बडवे, प्रशांत बडवे, पंचायत समिती सदस्य अंबिकाताई पाटील, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.












