सोलापूर : सोलापूर शहरातील आदीला नदी परिसरातील रेड लाईन, नदी विकास आराखडा आणि बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर आता राज्यस्तरावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी आदीला नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभाग, महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.आदीला नदी परिसरात पाटबंधारे विभागाकडून नदी सुधारणा आणि रेड लाईन निश्चितीचे काम सुरू आहे.
मात्र या प्रक्रियेमुळे परीसरातील अनेक नागरिक, शेतकरी आणि मालमत्ता धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य बाधित होणाऱ्या कुटुंबांनी आपल्या मालमत्ता आणि भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाची भूमिका समजून घेत नागरिकांशी संवाद साधला. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय किंवा मंत्रालयस्तरीय बैठक घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आचारसंहिता संपताच मंत्रालयात संबंधित विभागांची संयुक्त बैठक बोलावून हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.आदीला नदी विकासाच्या कामामुळे कोणत्याही नागरिकाचे अन्यायकारक नुकसान होऊ दिले जाणार नाही.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बाधित नागरिक यांच्यात समन्वय साधून सर्वांना न्याय मिळेल असा मार्ग काढला जाईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, बिंदास राहावे,” असे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी दिले.दरम्यान, या दौऱ्याचे आणि बैठकीचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले होते. त्यांच्या पुढाकारामुळे बाधित नागरिकांना आपली बाजू थेट उपसभापतींसमोर मांडण्याची संधी मिळाली. या बैठकीमुळे आदीला नदी प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.