मुंबई / सोलापूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांमधील वीजटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला. भीमा नदीलगतच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला.दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीलगतचा परिसर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे.
कर्नाटकातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा उपलब्ध होत असताना, दक्षिण सोलापूरमधील अनेक गावांमध्ये केवळ २ तास वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटकच्या धर्तीवर किमान ८ ते १० तास नियमित आणि पुरेसा वीजपुरवठा देण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. शेती आणि सिंचन व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
दरम्यान, तालुका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली असून यासंदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच ऊर्जा विभागालाही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतीच्या शाश्वत विकासासाठी हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न आता राज्य शासन कोणत्या पद्धतीने सोडवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.