No Result
View All Result
सोलापूर : मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकालगतच्या वसाहतीत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता नवीन पाटील यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी निचऱ्याच्या उपाययोजना, रेल्वे हद्दीतील अडथळे आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मानखुर्द परिसरातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचा सामना करावा लागत आहे. १९९२ मध्ये नवी मुंबईकडे जाणारा नवीन रेल्वे मार्ग उभारण्यात आल्यानंतर पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा बाधित झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या विविध कामांमुळे नाल्याची रुंदी कमी होत गेली आणि पाणी साचण्याची समस्या अधिकच गंभीर बनली. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात चार महिन्यांपर्यंत येथील नागरिकांना पाण्यातूनच दैनंदिन जीवन जगावे लागते. घरांमध्ये पाणी शिरणे, वाहतुकीत अडथळे, आरोग्याच्या समस्या आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान अशा अनेक अडचणींना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता नवीन पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणी निचरा सुरळीत होण्यासाठी रेल्वे, राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयातून संयुक्त उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर मुख्य अभियंता नवीन पाटील यांनी या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून लवकरच व्यवहार्य आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मानखुर्दमधील नागरिक अनेक वर्षांपासून या समस्येच्या निराकरणाची वाट पाहत असून, आता संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेतल्याने पावसाळ्यातील जलसंकटातून त्यांची सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.
No Result
View All Result