सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे लाखो वारकरी मार्गस्थ होत असताना त्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने “ग्रामविकासाची वारी… पंढरीच्या दारी” हा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.
या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, तात्पुरती निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, आरोग्य सेवा, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोबाइल चार्जिंग केंद्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय बूथ, आपत्कालीन रुग्णवाहिका, बचाव पथके, वाहतूक नियोजन, दिशादर्शक फलक, स्वागत कमानी, रस्त्यांचे सुशोभीकरण आणि प्रकाश व्यवस्था यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ग्रामविकास विभागाने “मान माऊलींचा, सेवा वारकऱ्यांची” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारला आहे. वारीदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून, भाविकांना सुरक्षित आणि आनंददायी वारीचा अनुभव देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे.”
वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा” या भावनेतून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असून, राज्य शासनाच्या सेवाभावी आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची प्रचिती देणारा ठरत आहे.