पंढरपूर | आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी देशभरातून पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी, यासाठी हे विशेष दालन उभारण्यात आले आहे. दालनात विविध विभागांच्या योजनांची माहिती आकर्षक आणि माहितीपूर्ण स्वरूपात सादर करण्यात आली आहे. ‘संवादवारी’ या उपक्रमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक करण्याबरोबरच जनजागृतीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वारकऱ्यांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने भाविक विशेष दालनाला भेट देत आहेत.