पंढरपूर,: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या ६५ एकर परिसरात लाखो वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते नगर सध्या भक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक बनले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या, भगवे पताके, टाळ-मृदंगाचा निनाद आणि अखंड हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे.
भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने या परिसरात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या, टँकर आणि सार्वजनिक नळांची व्यवस्था करण्यात आली असून, नियमित पाणीपुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर तात्पुरती शौचालये, स्नानगृहे उभारण्यात आली असून, स्वच्छता राखण्यासाठी कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत. आरोग्य सुविधांसाठी वैद्यकीय केंद्रे, डॉक्टर, परिचारिका, औषधसाठा, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन उपचार व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. उष्माघात, निर्जलीकरण किंवा इतर आरोग्यविषयक तक्रारींवर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभाग सतत दक्ष आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, नियंत्रण कक्ष तसेच हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, विश्रांती केंद्रे आणि माहिती कक्षही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हजारो कर्मचारी, विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून उभारलेले हे तात्पुरते नगर केवळ मुक्कामाचे ठिकाण नसून विठ्ठलभक्ती, सेवाभाव आणि प्रभावी नियोजनाचा आदर्श ठरत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज मुक्कामाची अनुभूती देणारे हे ६५ एकरांचे भक्तीनगर आषाढी वारीच्या व्यवस्थापनातील एक उल्लेखनीय उदाहरण बनले आहे.