सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे अधिकारी ग्रामविकास विभागाने पुन्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिले आहे. त्यामुळे शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, अशी अपेक्षा शिक्षकांतून व्यक्त केली जात आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्याकडेच बदल्यांचे अधिकार होते. मात्र काही वर्षापूर्वी बदल्यांची प्रक्रिया राज्यस्तरावर केंद्रिकृत करण्यात आली होती. ग्रामविकास विभागाकडून थेट प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत होत्या. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची ठरत होती. तसेच सॉफ्टवेअरमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा सीईओ यांना शिक्षक बदलीचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे येत्या शैक्षणिक सत्रासाठी म्हणजेच २०२५-२६ मधील बदलीची प्रक्रिया ही मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. त्यामुळे ३१ मे २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होऊन १५ जूनपर्यंत शिक्षकांना नवीन शाळेच्या ठिकाणी रुजू होता येईल.
बदल्यासाठी या होत्या अडचणी
अर्ज सादरीकरण, प्राधान्यक्रम तपासणी आणि याद्या प्रसिद्धीमध्ये त्रुटी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आणि अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. राज्य स्तरावरून होणाऱ्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव, तांत्रिक चुका आणि अन्यायकारक याद्यांमुळे ग्रामविकास विभागाला वारंवार प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत होते. त्यामुळे ग्रामविकास विभागाने शिक्षक बदल्याचे अधिकारी पुन्हा सीईओंना दिले आहेत.







