सोलापूर, : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या वाढीव पाण्याच्या आवकेमुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (दि. २७) सकाळी ११ वाजल्यापासून भीमा नदीपात्रात एकूण ६,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत उजनी धरण ९३.८७ टक्के भरले असून, सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे ५,००० क्युसेक्स आणि विद्युतगृहामधून १,६०० क्युसेक्स असा एकूण ६,६०० क्युसेक्स पाण्याचा प्रारंभीचा विसर्ग करण्यात येणार आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरण व्यवस्थापन विभागाने भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रात कोणालाही उतरू नये, तसेच नदीपात्रात जनावरे किंवा इतर साहित्य असल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती कार्यकारी अभियंता इंजि. सु. उ. डुंबरे, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.