सोलापूर, : उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावच्या हद्दीतील शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ६० वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २६) घडली. बाळासाहेब पंढरी गरड (वय ६०, रा. रानमसले) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब गरड यांनी रविवारी सकाळी सुमारे ११.४५ वाजता रानमसले येथील दामोधर गजघाटे यांच्या शेतातील पिंपळाच्या झाडाला कापडी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील तानाजी गोरे तसेच मयताचे भाचे जोतीराम साठे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना गळफासातून खाली उतरविले. त्यानंतर दुपारी सुमारे अडीच वाजता उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शनिवारी पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील कर्जमाफी योजनेचा शुभारंभ करून काही शेतकऱ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी रानमसले येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.