सोलापूर :- राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहक हक्कांचे संरक्षण व जागरूकतेचा दिवस आहे. तो केवळ कायद्याची आठवण करून देत नाही, तर प्रत्येक नागरिकाला सजग ग्राहक बनण्याचे आवाहन करतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले. जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष स्थानावरून श्री. निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा ग्राहक तक्रार समिती सदस्य भारती सोनवणे, जिल्हा ग्राहक पंचायत अध्यक्ष शशिकांत हरिदास, श्रीमती शोभना सागर, तानाजी गुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


अप्पर जिल्हाधिकारी श्री. निऱ्हाळी पुढे म्हणाले की, सर्व नागरिकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहिले पाहिजे. कोणीही कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक करणार नाही या दृष्टीने खरेदी करताना वस्तू विषयी माहिती जाणून घेतली पाहिजे. ग्राहक दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता कायमस्वरूपी प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारात प्रत्येक नागरिकांनी अत्यंत जागृत राहिले पाहिजे. तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांचेही त्या दृष्टीने प्रबोधन केले पाहिजे, जेणेकरून फसवणूक होऊ नये असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेले स्टॉल सर्वांनी पहावे व त्याबद्दल माहितीही घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा ग्राहक तक्रार समिती सदस्य भारती सोनवणे यांनी प्रथम सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व ग्राहक संरक्षण कायदे अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा जलद व्हावा या दृष्टीने सर्व नागरिकांचे समाज प्रबोधन व्हावे यासाठी सरकारने 2019 साली सुधारित ग्राहक हक्क कायद्यात सुधारणा केली असं सांगितले. सर्व ग्राहकांनी सावध रहावे व काही शंका वाटल्यास हेल्पलाइन चा वापर करून तक्रार नोंदवावी जेणेकरून इतर कोणाची फसवणूक होणार नाही. ही सर्व यंत्रणा राबविण्यासाठी शासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे तक्रार निवारणाच्या गोष्टीसाठी विलंब होत आहे.

श्रीमती शोभना सागर यांनी ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही भावी पिढीचे शिलेदार आहात व ग्राहक देखील आहात. त्यासाठी तुम्ही सर्वांनी देखील ग्राहक हक्क विषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे. शशिकांत हरिदास म्हणाले की, हे धोरण अंमलात आणण्यासाठी शासकीय स्तरावर संगणक प्रणाली, पुरेसे मनुष्यबळ कार्य प्रणाली नाही व अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळा देखील नाही. ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील नाहीये. आधुनिक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे शासनाने ही यंत्रणा सक्षम करावी जेणेकरून ग्राहकांना वेळोवेळी न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण होईल.
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सर्व नागरिक ग्राहकांचे हक्क सुरक्षा व तक्रार निवारण या अनुषंगाने माहिती करून देणे हा असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले. तसेच इसवी सन 1986 साली ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी अस्तित्वात आला. तेव्हापासून ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. ग्राहकांचे सहा प्रमुख हक्क काय आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.










