सोलापूर: शहरातील पाणीटंचाईच्या दाहकतेचे पडसाद आज महापालिका सभागृहात उमटले. अनियमित पाणीपुरवठ्यावरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः हद्दवाढ भागात ५ ते ६ दिवसांनी पाणी मिळत असल्याच्या तक्रारींवरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.
दरम्यान, “जर हद्दवाढ भागाला गावठाण प्रमाणे पाणी देता येत नसेल, तर तेथील नागरिकांकडून अर्धीच पाणीपट्टी आकारा,” अशी रोखठोक मागणी पत्रकार तथा नगरसेवक मनीष केत यांनी केली.सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच पाणीपुरवठ्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्यावर नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. शहरात विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप असून प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
नगरसेवक मनीष केत यांनी हद्दवाढ भागातील नागरिकांची कैफियत मांडताना महापौरांना थेट सूचना केली. ते म्हणाले, “शहराच्या एका भागात नियमित पाणी मिळते आणि हद्दवाढ भागात मात्र ५-६ दिवस वाट पाहावी लागते. हा भेदभाव अन्यायकारक आहे. जर प्रशासन समान पाणी वाटप करू शकत नसेल, तर या भागातील पाणीपट्टी निम्मी करण्यात यावी.” त्यांच्या या भूमिकेला अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
- सभागृहातील चर्चेची दखल घेत महापौरांनी प्रशासनाला पुढील ४८ तासांत पाणीपुरवठ्याचे सुधारित आणि निश्चित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि गळती रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सोलापूरच्या नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही या निमित्ताने प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.










