सोलापूर : येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरूकार कै.ल. गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा दैनिक तरूण भारत संवाद सोलापूरचे निवासी संपादक विजय देशपांडे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरूवार, दि.९ एप्रिल रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (अॅम्फी थिएटर) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. गेल्या २० वर्षापासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरु आणि आनंदवृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकाचे संपादक कै. ल. गो. तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याचवेळी डॉ. रविंद्र चिंचोळकर यांचा "राजकारण व पत्रकारिता" या पुस्तक लेखनाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका व माध्यम अभ्यासिका उज्वला बर्वे (पुणे) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांचे "पत्रकारिता कालची, आजची आणि उद्याची" या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दै. लोकमत सोलापूरचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी भूषविणार आहेत.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेची २ ऑगस्ट १९३१ रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या उद्देशाने सोलापुरात स्थापना झाली. संस्थेतर्फ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. संस्थेतर्फे वधू-वर सूचक मंडळ, गुणीजनांचा सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्यांचे मार्गदर्शन, शालेय मुलांसाठी पाठांतर स्पर्धा, परिसंवाद, सामुदायिक उपनयन संस्कार, रक्तदान शिबीर, स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर इत्यादी उपक्रम नियमित आयोजित केले जातात, अशी माहिती यावेळी देण्यात आली या पत्रकार परिषदेला हेमा चिंचोळकर, श्याम जोशी आदी उपस्थित होते











