सोलापूर: शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे यांनी आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी आमदार कोठे यांनी नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेऊन सोलापूरच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा केली. या भेटीत आयटी पार्कपासून ते उड्डाणपुलांपर्यंतच्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याने सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आमदार देवेंद्र कोठे यांनी या भेटीत केवळ औपचारिकता न पाळता सोलापूरच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला. सोलापूरच्या तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयटी पार्क’च्या उभारणीवर भर दिला.शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चर्चा केली. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. सोलापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कामगारांच्या सोसायटीचा बी-२’ चा प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आमदार कोठे यांच्या सर्व मागण्या आणि मुद्दे अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले. “सोलापूरच्या विकासकामांमध्ये वैयक्तिक लक्ष घालून, अत्यंत कमी कालावधीत जनतेच्या मागण्या पूर्णत्वास नेऊ,” असा ठाम विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. प्रशासकीय प्रमुखांनी दिलेल्या या शब्दामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. नूतन जिल्हाधिकारी हे नव्या उमेदीचे अधिकारी असून, त्यांच्या कार्यकुशलतेमुळे सोलापूरच्या विकासाचा वेग आता अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे.”या महत्वपूर्ण बैठकीप्रसंगी गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आमदार कोठे यांच्या या ‘डेव्हलपमेंट अजेंडा’मुळे सोलापूर शहरातील अनेक जुने प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहेत, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.










