दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन : जिल्हाधिकारी
सोलापूर : भीमा नदीकाठावरील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी वीज समस्येवर सविस्तर चर्चा करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना सिंचन व दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. विशेषतः भीमा नदीकाठच्या गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी बाजार समिती संचालक प्रथमेश पाटील, संचालक अविनाश मार्तंडे, संचालक नागाण्णा बनसोडे, सरपंच उमेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.











