वादमुक्त रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश; ४९११ शेत-पाणंद रस्त्यांची यादी तयार
सोलापूर : मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वाची आणि शेतरस्ते विकासातील सर्वोत्तम योजना असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
नियोजन भवन येथे आयोजित मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, पहिल्या टप्प्यात वाद नसलेल्या रस्त्यांचे सीमांकन पूर्ण करून त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. दुसऱ्या टप्प्यात वादग्रस्त रस्त्यांचे वर्गीकरण करून तालुकास्तरीय समित्यांनी संबंधित आमदारांच्या समन्वयातून या योजनेच्या कामांना गती द्यावी. या योजनेअंतर्गत एका किलोमीटर रस्त्यासाठी कमाल १५ लाख रुपयांपर्यंत खर्च प्रस्तावित असून जिल्ह्यात निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

महसूल व वन विभागामार्फत १४ डिसेंबर २०२५ पासून ही योजना सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मजबूत व सुलभ रस्ते उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी चर खोदणे, मुरुम टाकून दबाई करणे आणि आवश्यक ठिकाणी सिमेंट पाइप बसविणे अशी कामे या योजनेत केली जाणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांनी दिली. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक श्री. घोडके यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ४९११ शेत-पाणंद रस्त्यांची यादी प्राप्त झाली असून त्यापैकी ३७२ रस्त्यांचे सीमांकन पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या सीमांकनाची कार्यवाहीही वेगाने सुरू आहे.












