सोलापूर : राज्यातील १३ जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातही आंदोलनाची धग वाढली आहे. पालखी महामार्ग आणि पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गास समांतर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादनास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत “एक इंचही जमीन देणार नाही” असा निर्धार व्यक्त केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील अरण गावात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माढा तालुक्यातील द्राक्ष, ऊस आणि डाळिंबाच्या बागायती क्षेत्रावर या महामार्गाचा मोठा परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उजनीच्या डाव्या कालव्यातून १० ते १२ किलोमीटर पाइपलाइन टाकून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बागायती केल्या आहेत. या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

संत सावता माळी महाराजांची संजीवन समाधी असलेल्या अरण गावातून हा महामार्ग प्रस्तावित आहे. “कांदा, मुळा, भाजी; अवघी विठाई माझी” हा जगप्रसिद्ध अभंग याच अरण गावच्या शेतमळ्यात रचला गेला होता. दरवर्षी आषाढी वारीनंतर विठ्ठलाची पालखी पंढरपूरहून सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे येते. या धार्मिक व ऐतिहासिक वारशाच्या गावातून महामार्ग जात असून सुमारे ६०० एकर जमीन संपादित होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजू शेट्टी यांनी संतप्त होत पोलिसांना धारेवर धरले. “दडपशाही केल्यास राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्याने सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू राहिले.












