मंद्रूप नाईक नगर तांड्यावर शोककळा; पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घाला
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप नाईक नगर तांडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.समर्थ मोहन चव्हाण (वय १२) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय १०) अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. दोघेही मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते आणि अत्यंत निरागस व खेळकर स्वभावाचे असल्याने गावात सर्वांच्या परिचयाचे होते.

त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलांचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास दोन्ही मुले खेळत खेळत आपल्या शेताजवळ गेली. त्यानंतर त्यांनी शेततळ्यात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आली. बराच वेळ मुले घरी न आल्याने आई-वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. गावातील नागरिकांनीही शोधमोहीम हाती घेतली.











