भाजपचे राजेंद्र राऊत यांच्यासह पाच अपक्षांचे आव्हान; अंतिम उमेदवार यादी जाहीर
सोलापूर ; सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. अंतिम यादीत एकूण सात उमेदवारांचा समावेश असून आता प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे महाविकास आघाडीकडून केशव दौलतराव बनगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. तर भारतीय जनता पक्षाने राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास व्यक्त करत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये थेट सामना होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

याशिवाय अक्कलकोट नागेश हरिभाऊ बाबराव, जीवन उत्तमराव जानकर, धनंजय महादेव डिकळे, महेश देविदास साठे आणि रमेश नागनाथ बारस्कर यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे. अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे काही प्रमाणात मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमधून ही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी काही दिवसांत प्रचारसभा, बैठका आणि संपर्क मोहिमा यांना वेग येणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीत प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

- हे उमेदवार रिंगणात
- केशव दौलतराव बनगर (काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी )
- राजेंद्र विठ्ठल राऊत (भारतीय जनता पार्टी )
- अक्कलकोट नागेश हरिभाऊ बाबराव (अपक्ष)
- जीवन उत्तमराव जानकर (अपक्ष)
- धनंजय महादेव डिकळे (अपक्ष)
- महेश देविदास साठे (अपक्ष)
- रमेश नागनाथ बारस्कर (अपक्ष)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर सर्वांचे लक्ष
विधान परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींतील निवडून आलेले सदस्य मतदान करणार आहेत. त्यामुळे पक्षीय ताकद, गटबाजी आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा निकालावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.












