२३ जर्मन हँगर, ५ हजार शौचालये, २२० पाण्याचे टँकर, १३ आरोग्य रथ, २३ जर्मन हँगरसह लाखो वारकऱ्यांसाठी व्यापक नियोजन
सोलापूर, : राज्यातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वंकष तयारी पूर्ण केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, निवारा, महिला सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापन अशा विविध घटकांचा समावेश असलेला व्यापक आराखडा तयार करण्यात आला असून सर्व विभागांमध्ये समन्वय साधून कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी माहिती दिली. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यंदा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील ८१ गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. या प्रवासादरम्यान ३८ मुक्काम, ४३ विसावे आणि ७ रिंगण सोहळे पार पडणार आहेत. लाखो वारकऱ्यांचा सहभाग लक्षात घेऊन प्रत्येक मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.स्वच्छता व्यवस्थेला प्राधान्य देत जिल्हा परिषदेमार्फत ५ हजार तात्पुरती आणि फिरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी दररोज १,८०० तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी १,२०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा विचार करून ५०० स्वतंत्र स्नानगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच नियमित स्वच्छता, जंतुनाशक फवारणी आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.

वारकऱ्यांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावर २२० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. सर्व जलस्रोतांची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दीच्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रांतर्गत मुक्कामाच्या ठिकाणी २३ जर्मन हँगर आणि ३७ वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. या सुविधा केंद्रांमध्ये वारकऱ्यांसाठी ओपीडी सेवा, विश्रांती व्यवस्था, मोबाईल चार्जिंग सुविधा, पंखे, पिण्याचे पाणी आणि महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उपलब्ध राहणार आहेत. पावसाळी वातावरणात वारकऱ्यांना सुरक्षित निवारा मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
वारीदरम्यान आरोग्य सेवेवर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत १३ ‘मेडिसिन ऑन व्हील’ आरोग्य रथ २४ तास कार्यरत राहणार असून हे रथ पालखी मार्गावरील विविध ठिकाणी तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवतील. याशिवाय १५८ तात्पुरती आरोग्य सल्ला केंद्रे, १२१ बाईकवरील आरोग्य दूत आणि २१ आपत्कालीन आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य व्यवस्थापनासाठी ४४० वैद्यकीय अधिकारी, ४३५ आरोग्य कर्मचारी आणि २ हजार ८२२ आशा सेविका नियुक्त करण्यात आल्या आहेत. उष्माघात, संसर्गजन्य आजार, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींना तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी विशेष नियंत्रण कक्षही कार्यरत राहणार आहे.महिला वारकऱ्यांसाठी १६७ हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन तसेच वापरलेल्या नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी डिस्पोजल मशीनची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे महिला वारकऱ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.











