सोलापूर/पंढरपूर : आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये कामाच्या श्रेयावरून सुरू असलेली अप्रत्यक्ष स्पर्धा आता चर्चेचा विषय ठरू लागली आहे. विविध विभागांकडून दररोज प्रसिद्धीपत्रके जारी करून केलेल्या कामांचा गाजावाजा केला जात असताना, प्रत्यक्षात वारकऱ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांवर कितपत भर दिला जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सोशल मीडियासह विविध स्तरांतून “प्रसिद्धीपत्रकांची स्पर्धा कशासाठी?”, “जनतेच्या पैशावर स्वतःची जाहिरात का?” अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होण्यापूर्वी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक व्यवस्था आणि निवासाच्या सोयी यांसारख्या मूलभूत कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.यात्रेच्या तयारीत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे अपेक्षित असताना, श्रेयाच्या राजकारणामुळे मूळ उद्दिष्ट बाजूला पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळणे हेच प्रशासनाच्या कामाचे खरे यश मानले जाईल. त्यामुळे ‘श्रेय’ नव्हे तर ‘सेवा’ महत्त्वाची असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असून, त्याचे उत्तर आता प्रसिद्धीपत्रकातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.