सोलापूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरातील लष्कर परिसरातील जगदंबा चौक येथे राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण, पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाच्या अखंड गजरात परिसर भक्तिरसाने भारावून गेला.यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदो, बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, वरुणराजाची कृपा राहावी, प्रत्येक कुटुंब निरोगी व आनंदी राहावे तसेच महाराष्ट्र संतपरंपरेच्या विचारांनी अधिक समृद्ध व्हावा, अशी भावपूर्ण प्रार्थना केली.पालखी आगमनावेळी त्यांनी महिलांसमवेत टाळ-मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत वारकरी परंपरेतील भक्तीभाव अनुभवला. “गण गण गणात बोते” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला.
पांढऱ्याशुभ्र वेशातील वारकरी, भगव्या पताका आणि अभंगांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले.याप्रसंगी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.या सोहळ्यास नगरसेविका कल्पना कदम, दीपक पाटील, अविनाश जाधव, धनंजय पाटील, मोहन नारळे, दिनेश लोणार, भैय्या माने, प्रशांत लोणार, हुलजनतीवाले, मंगेश जंगडेकर, गणेश तुपदोळे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव ठरला.