पंढरपूर, दि. २३ : आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवारी (दि. २४) होत असून, यंदा राज्यातील १४ जिल्ह्यांतील तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.
वारीदरम्यान पायी चालण्यामुळे होणारा शारीरिक ताण, पायांवरील फोड, स्नायूदुखी, थकवा आणि पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, औषध वितरण आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्थाही करण्यात आली. यंदा सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या १४ जिल्ह्यांतील १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली. मागील वर्षी सात जिल्ह्यांत सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा दुप्पट विस्तार करण्यात आला.
या सेवाकार्यात १६४ आरोग्य संस्थांचा सहभाग होता. तब्बल ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी, तसेच ७ हजार ५३८ स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना सेवा दिली. चरणसेवेसाठी सुमारे ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर करण्यात आला, तर जनजागृतीसाठी ८ आरोग्य रथ कार्यरत होते. आरोग्यसेवे सोबतच स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान, निरोगी जीवनशैली आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबतही वारकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली.
उपक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना आयोजकांनी सांगितले की, लोकसहभाग, आरोग्य संस्था, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘चरणसेवा’ उपक्रम प्रभावीपणे राबविता आला आणि लाखो वारकऱ्यांना प्रत्यक्ष आरोग्याचा आधार मिळाला.