सोलापूर : आगामी आषाढी व कार्तिकी वारी अधिक सुलभ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पुढील वारीपासून ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंध वारकऱ्यांसाठी ‘मुखदर्शन’ व ‘पथदर्शन’ अशी विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, वाळवंट परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी दोन नवीन पादचारी पुलांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
यंदाची आषाढी वारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा प्रशासन, मंदिर समिती आणि विविध विभागांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडली. जवळपास ३३ लाख वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसाठी निवास, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आणि सुरक्षा यंत्रणेचे प्रभावी नियोजन करण्यात आल्याने यंदाची वारी ‘निर्मळ वारी’ ठरल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील वारीत शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार ओळखपत्र सादर करणाऱ्या ७० वर्षांवरील वारकऱ्यांना मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अंध वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पथदर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय इस्कॉन मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर आणि शेगाव दुमाला परिसरात गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने भीमा नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, जनावरे, कृषी पंप व अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले. प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी आणि नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले