No Result
View All Result
रेशीम शेती ठरणार उत्पन्नवाढीचा नवा पर्याय; सभापती दिलीप माने यांचा विश्वास
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उत्पादन हा शेतीपूरक आणि अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकतो. पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेतीचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न निश्चितच वाढेल, असा विश्वास श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या रेशीम संचालनालय, नागपूर आणि श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम कोषाच्या नियंत्रित लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास पुणे येथील रेशीम संचालनालयाचे सहाय्यक संचालक विठ्ठल फड अध्यक्षस्थानी उपस्थित होते.लिलावात रेशीम कोषाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रतिकिलो ६४० ते ७८० रुपये असा भाव मिळाला, तर सरासरी ७६५ रुपये प्रति किलो दर नोंदविण्यात आला. पहिल्याच दिवशी २०१ किलो रेशीम कोषाची विक्री झाली असून १ लाख ५३ हजार ८०३ रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे रेशीम उत्पादनाला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे स्पष्ट झाले.यावेळी सहाय्यक संचालक विठ्ठल फड यांनी रेशीम उद्योगाचे आर्थिक महत्त्व अधोरेखित करताना, सोलापूर बाजार समितीने हा उपक्रम सुरू करून शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, संचालक नागना बनसोडे, प्रथमेश पाटील, केदार विभुते, गफ्फार चांदा, विविध जिल्ह्यांतील रेशीम उत्पादक शेतकरी, खरेदीदार, रेशीम संचालनालयाचे अधिकारी तसेच बाजार समितीचे सचिव अतुलसिंग रजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“पारंपरिक शेतीसोबत रेशीम उत्पादनाचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांना वर्षभर नियमित उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रेशीम उत्पादकांना चांगली बाजारपेठ आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”— दिलीप माने, सभापती, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर
No Result
View All Result