No Result
View All Result
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला ‘माळढोक’ पक्ष्याच्या अधिवासाचा मोठा अडथळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या मध्यभागी येणाऱ्या ३३.७२ हेक्टर जमिनीच्या संपादनासाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने २०२१ मध्ये पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्यावर कोणताही फेरप्रस्ताव सादर करण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकारातून २००८ मध्ये बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २००९ पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. गेल्या १४ वर्षांत सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्च करून तब्बल १,४३७ एकर (सुमारे ५७५ हेक्टर) जमीन संपादित करण्यात आली. मात्र, धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या ८४ एकर (३३.७२ हेक्टर) क्षेत्राच्या संपादनात वन्यजीव संवर्धनाचे नियम अडसर ठरले आहेत. २०१८ मध्ये भारतीय वन्यजीव संस्थेने (Wildlife Institute of India) केलेल्या सर्वेक्षणात बोरामणी परिसरातील या भागात दुर्मिळ व संकटग्रस्त ‘माळढोक’ पक्ष्याच्या मादीचा नियमित अधिवास असल्याचे स्पष्ट झाले होते. हा अहवाल केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर पर्यावरणीय कारणांमुळे २०२१ मध्ये विमानतळ विकास प्राधिकरणाचा जमीन संपादनाचा प्रस्ताव नाकारण्यात आला.1
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रस्ताव फेटाळल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने पर्यायी आराखडा किंवा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे बोरामणी विमानतळ प्रकल्पाचा प्रश्न आजही प्रलंबित असून, प्रकल्पाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता कायम आहे दरम्यान, या पार्श्वभूमीवर संबंधित ३३.७२ हेक्टर क्षेत्र वगळून उर्वरित संपादित जमिनीचा औद्योगिक विकासासाठी वापर करण्याचा पर्याय पुढे येत आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र कायम ठेवून त्या भागात लॉजिस्टिक पार्क विकसित करणे आणि उर्वरित जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याबाबत मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका व्यक्त केली असून, पर्यावरणीय अटींचे पालन करून या जमिनीचा औद्योगिक विकासासाठी उपयोग होऊ शकतो, असे मत त्यांनी नोंदवले आहे.
एकीकडे सोलापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प रखडलेला असताना, दुसरीकडे संपादित जमिनीच्या पर्यायी वापराचा पर्याय पुढे येत असल्याने या प्रकल्पाचे भवितव्य नेमके कोणत्या दिशेने जाणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
No Result
View All Result