No Result
View All Result
सोलापूर : आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगावरील उपचार घेणे कठीण ठरणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील १९ चिमुकल्यांसाठी जिल्हा परिषदेचा संवेदनशील पुढाकार जीवनदायी ठरला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र (DEIC), जिल्हा रुग्णालय सोलापूर आणि मुंबईतील बालाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून १९ बालकांवर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
विशेष म्हणजे, केवळ उपचाराची व्यवस्था करून प्रशासन थांबले नाही, तर पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सीईओ कुशल जैन यांनी स्वतः पुढाकार घेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकांशी संवाद साधला. उपचाराची गरज, शस्त्रक्रियेची प्रक्रिया आणि त्यातून होणारे फायदे समजावून सांगत त्यांनी पालकांना धीर दिला. प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिल्यानंतर पालकांनी आपल्या चिमुकल्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यास संमती दिली.
११ ऑगस्ट २०२६ रोजी मोफत हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी १८ बालकांना विशेष बसद्वारे मुंबईतील बालाजी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यापूर्वीच्या बालकासह आतापर्यंत एकूण १९ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सर्व बालके आपल्या पालकांसह सुखरूप घरी परतली आहेत. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गरजू कुटुंबांवर उपचाराचा आर्थिक भार पडू नये, याची प्रशासनाने काळजी घेतली. बालकांसह पालकांचा मुंबईपर्यंतचा प्रवास, तेथील निवास, जेवण-नाश्ता, उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरचा परतीचा प्रवास यासाठी पालकांना कोणताही खर्च करावा लागला नाही.
हृदयरोगावरील महागडे उपचार परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी ही सुविधा मोठा आधार ठरली. चिमुकल्यांच्या उपचारासोबत त्यांच्या पालकांना मानसिक आधार देण्याचे कामही या उपक्रमातून झाले. या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व DEIC केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, DEIC केंद्र आणि बालाजी हॉस्पिटल यांच्या समन्वयातून गरजू बालकांना वेळेत उपचार मिळाल्याने १९ कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. प्रशासकीय पुढाकाराला संवेदनशीलतेची जोड मिळाल्यास आरोग्यसेवेचा लाभ थेट गरजूंच्या घरापर्यंत पोहोचू शकतो, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.
No Result
View All Result