सोलापूर : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ध्येय निश्चित करून सातत्य, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर यशाची उंची गाठता येते. शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच समाजाच्या प्रगतीत योगदान देण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
गवंडी सगर गवंडी समाज सेवा संघाच्या वतीने किल्लेदार मंगल कार्यालय येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष हिरशेट्टी गुरूजी होते. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
खा. डॉ. वाघमारे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशावर समाधान मानून थांबू नये. आज मिळालेले यश ही भविष्यातील मोठ्या प्रवासाची केवळ सुरुवात आहे. ज्ञानासोबत कौशल्य, संस्कार आणि आत्मविश्वास विकसित करणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात उपलब्ध होणाऱ्या नव्या संधींचा विद्यार्थ्यांनी वेध घ्यावा. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासन, उद्योग, व्यवसाय आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाटांपुरते मर्यादित न राहता आपल्या क्षमतेनुसार क्षेत्राची निवड करावी. अपयश आले तरी निराश न होता त्यातून धडा घेऊन नव्या जोमाने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःच्या यशाचा विचार न करता समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करावे. पुढील पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. यावेळी समाजातील अनिल सगर यांची अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल, तर अर्जुन हिरशेट्टी आणि देविदास राजापुरे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक प्रियदर्शन साठे, अर्जुन हिरशेट्टी, देविदास राजापुरे, सिद्धाराम चंद्रपाटले, किशोर पेंडीले, मार्गरेट सगर, अनुजा बेंजरपे, भारत सगर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनंजय सगर, अविनाश बेंजरपे, भीमराव जरते, देविदास सगर, ज्योती हिरशेट्टी यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय राखले यांनी केले, तर आभार मार्गरेट सगर यांनी मानले