सोलापूर, : स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून सादर करणारे सुहास कदम यांचे अवैध सट्टा-मटका व्यवसायाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केली. कोल्हे यांनी कदम यांच्यावर विनयभंग, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांवर हल्ल्याचा प्रयत्न करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला. तसेच सरकारी नोकरी, शासकीय कंत्राटे (टेंडर) मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिक व महिलांकडून पैसे उकळणे, काही राजकीय नेत्यांची नावे वापरून फसवणूक करणे आणि अवैध सट्टा-मटका व्यवसायाशी संबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला.
यापूर्वी आंदोलनाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा तसेच पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप कोल्हे यांनी केला. काही महिलांची आर्थिक व इतर प्रकारे फसवणूक झाल्याचा दावा करत या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कोल्हे यांनी संबंधित आरोपांची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाने पार पाडावी, असे पत्रकार परिषेदेस सांगतले आहे
सायरा शेख यांनी सांगितले की, ३० जून रोजी आपण पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून त्यानंतरच सुहास कदम यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली. “मी व्याजाने पैसे देते” हा आरोप पूर्णपणे खोटा असून संबंधित आर्थिक व्यवहार बँकेमार्फत (RTGS) झाल्याने त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःप्रमाणेच अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा दावा करत पीडित महिलांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महिलांचा राजकीय हेतूंसाठी वापर करू नये, अशी भूमिका मांडत, पुन्हा बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविषयीची माहिती सार्वजनिक करणार असल्याचा इशाराही सायरा शेख यांनी दिला.