इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी; “जनतेला दिलासा द्या”ची मागणी
सोलापूर : वाढती महागाई, इंधनदरवाढ आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक संकटाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर शाखेच्या वतीने बुधवारी “मोफत बैलगाडी प्रवास” हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. वाढत्या इंधनदरांमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण होत असल्याचा आरोप करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध आशयघन फलक हातात घेत सरकारपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “देशवासियांवर बैलगाडीची वेळ येण्याआधी सरकार जागं व्हा!”, “जनतेच्या खिशाला कात्री, उद्योगपतींना सवलती!”, “जनतेला सल्ले नकोत, दिलासा हवा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सरकारकडून नागरिकांना काटकसरीचे सल्ले दिले जात असताना दुसरीकडे इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी शहराध्यक्ष निलेश संगेपाग यांनी केंद्र सरकारने देशहितापेक्षा निवडणुकांना प्राधान्य दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. “आता आणखी विलंब न करता देशहितासाठी ठाम भूमिका घ्यावी. उद्योगपतींसोबतच नेतेमंडळींनाही त्याग करावा लागेल,” असे ते म्हणाले. माजी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी पीएम केअर फंड आणि भाजप पक्षाचा निधी देशहितासाठी वापरण्याची मागणी केली.












