सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना निशुल्क व गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे आवश्यक असून उपचार, शुल्क किंवा वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत एकही तक्रार येता कामा नये, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांना दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवार, जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, योगेश डोके यांच्यासह शासकीय व खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत १२३ शासकीय व खासगी रुग्णालये अंगीकृत आहेत. शासनाकडून प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण दिले जात असून २७ विशेष सेवांअंतर्गत २३९९ उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयांनी पात्र रुग्णांना तत्काळ योजनेचा लाभ देणे अनिवार्य आहे. रुग्णालयांमध्ये योजनेविषयी माहिती देणारे फलक व टोल फ्री क्रमांक दर्शनी भागात लावावेत, तसेच उर्वरित २८ रुग्णालयांमध्ये तातडीने ‘आरोग्यमित्र’ नियुक्त करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सध्या ९५ रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्र कार्यरत आहेत.


जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी अचानक रुग्णालयांना भेट देऊन तपासणी करणार असल्याचे सांगत, योजनेंतर्गत रुग्णांना योग्य सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला. दरम्यान, जिल्ह्यात आयुष्मान कार्ड काढण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने दररोज दहा हजार कार्ड काढण्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. आशा सेविका, नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.














