“राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे”; ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाचे केले सारथ्य
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दसूर पाटी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेत राज्यातील सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी-समाधानी राहू दे,” असे साकडे त्यांनी माऊलींच्या चरणी घातले. यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचे काही काळ सारथ्यही केले. वारीत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वारीत चालणारा प्रत्येक वारकरी हा माऊलीचे जिवंत रूप आहे. या पवित्र सोहळ्यात सहभागी होणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माऊलींकडे माझी एकच प्रार्थना आहे की, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा.”
ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांत वारी व्यवस्थापनात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वारीत विक्रमी संख्येने भाविक सहभागी होत असून, मागील वर्षांचे सर्व विक्रम मोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचेही कौतुक केले. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे भाविकांची संख्या मोजली जात असून, स्वच्छता, शौचालये, सफाई कर्मचारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जर्मन हँगर, चरणसेवा उपक्रम, आरोग्य पथके आणि इतर मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी वारी २०२६ च्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.