ढगाळ वातावरण कायम; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
सोलापूर ; सोलापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते.
मंगळवार सकाळपासूनच अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. काही भागांत रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची नोंद झाली. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागले. सलग पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून, नागरिकांनीही उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. बाजारपेठांमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ होती, मात्र पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांना छत्री आणि रेनकोटचा आधार घ्यावा लागला.

दुसरीकडे, ग्रामीण भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे खरीप पिकांना फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील एक-दोन दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











