सोलापूर, : डफरीन चौक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) काही विद्यार्थिनींनी मानसिक व धार्मिक छळ होत असल्याची तक्रार केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेतील प्रशासकीय कामकाज, विद्यार्थिनींच्या तक्रारी तसेच माजी प्राचार्यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करण्यासाठी पुणे येथील उपसंचालक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहे. यापूर्वी मुंबई येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) उच्चस्तरीय मुख्य कार्यालयीन चौकशी समितीने संस्थेला भेट देऊन काही विभागांतील विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला होता.
सकल हिंदू समाजाने दिलेल्या लेखी निवेदनात गटनिदेशिका आणि प्राचार्यांवर हिंदू विद्यार्थिनींना कुंकू-टिकली लावण्यावरून चिडवणे, मानसिक त्रास देणे, बळजबरीने गणवेश विक्री करणे तसेच नियमबाह्य तासिका कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच महिला संस्थेत सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून पुरुष सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला आहे. पूर्वी मेघना जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशी समितीने दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवराज गायकवाड यांनी केली आहे. यावेळी सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव म्हेत्रे, बाबा बनसोडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पाच वर्षांच्या कामकाजाची चौकशीची मागणी
संस्थेतील तासिका तत्त्वावरील एका कर्मचाऱ्याने मुलींच्या आयटीआयमध्ये अध्यापन करत असतानाच अक्कलकोट आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा प्रकार चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्हीकडे उपस्थिती नोंदी असल्याचेही निदर्शनास आले असून त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. मागील पाच वर्षांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी झाल्यास आणखी धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे.प्रभारी प्राचार्यांची भूमिका
आरोपांबाबत विचारणा केली असता प्रभारी प्राचार्य प्रदीप हरिदास यांनी आपली नुकतीच बार्शी येथे बदली झाल्याचे सांगितले. तक्रार अर्जात आपले नाव असले तरी संबंधित प्रकरणावर भाष्य करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याने सध्या अधिक माहिती देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रभारी प्राचार्य मनोज बीडकर यांनी संस्थेतील नऊपेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. ब्युटीपार्लर आणि शिवणकाम विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादामुळे संस्थेची बदनामी होत असल्याचा दावा त्यांनी केला. इतर विभागांतील विद्यार्थिनींकडून कोणत्याही तक्रारी नसल्याचेही त्यांनी नमूद केले.पोलीस निरीक्षकांचे स्पष्टीकरण
या प्रकरणात समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केल्याच्या संदर्भात पुढील चौकशीसाठी शिवराज गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले. तक्रारदार महिलेसह पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत दूरध्वनीवरून सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र रात्री उशिरापर्यंत ते पोलीस ठाण्यात आले नसल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.











