पंढरपूर, ; बारामती विधानसभा मतदारसंघ हा आमच्यासाठी भावनिक प्रश्न असून या मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशीच आमची भावना आहे. यासाठी वेळ पडली तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिली. रविवारी, तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बारामती पोटनिवडणुकीच्या मुदयावर चर्चा केली. यावेळी आमदार अभिजित पाटील, राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून यासाठी उद्या (सोमवारी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यासाठी बारामतीला जाण्यापूर्वी तटकरे यांनी पंढरीत येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना सुनेत्रा पवार यांच्च्या बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. परंतु, याविषयी अधिकृत कोणीही घोषणा केली नाही. यासंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधला असून ते केरळ निवडणुकीत व्यस्त आहेत. तरीही आज किंवा उद्या यावर चर्चा होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच वेळ पडली तर राहुल गांधी यांनादेखील भेटण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्व. अजित पवार यांच्या मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून यावर खासदार पार्थ पवार यांनीदेखील सहमती दर्शवली आहे. यावर बोलताना तटकरे यांनी, स्व. अजितदादांचा मृत्यू सर्वांसाठीच धक्कादायक असून याप्रकरणी आलेला प्राथमिक अहवाल समाधानकारक नसल्याचे आम्ही जाहीर केले आहे. सध्या याची सखोल चौकशी सुरू असून ज्यांनी कोणी याबाबत शंका उपस्थित केली आहे, पुरावे दिले आहेत. त्याअनुषंगाने तपास व्हावा, अशो आमची पहिल्यापासून मागणी आहे. आमदार रोहित पवार यांच्या आरोपाविषयीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, लोकसभेचे १६ एप्रिलपासून विशेष अधिवेशन असून यामध्ये देशातील खासदार व आमदारांच्या संख्येत होणारी वाढ, महिलांचे आरक्षण यावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात सध्या ४८ खासदार असून हो संख्या ७२ तर विधानसभेचे २८८ आमदार असून ही संख्या ४३२ होणार आहे. यामध्ये महिलांचे आरक्षण किती यावर चचर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी दिली.










