No Result
View All Result
सोलापूर, दि. ६ : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याच्या ठरावानंतर निर्माण झालेल्या राजकीय व सामाजिक वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातील कोणाचाही पुतळा हटविण्याचा प्रश्नच नसून, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जावा, ही आपली मनापासूनची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थायी समितीच्या बैठकीत शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रशांत बाबर यांनी या निर्णयावर टीका केली असून, संभाजी ब्रिगेडचे शाम कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत ठराव मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.या वादादरम्यान जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुतळ्याबाबतही चर्चा सुरू झाली.
यावर प्रतिक्रिया देताना इंद्रजीत पवार म्हणाले, “कोणाचाही पुतळा हटविण्याचा आमचा कोणताही विचार नाही. जिल्हा परिषदेचा सदस्य आणि उपाध्यक्ष म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की, या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जावा.”पवार यांनी पुढे सांगितले की, जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान नेत्याचे नाव शिवरत्न सभागृहाला देण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
No Result
View All Result