२७ मेपासून सुरुवात; गैरसोय टाळण्यासाठी नियोजन
सोलापूर, शहर प्रतिनिधी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे-जून २०२६ च्या मुख्य उन्हाळी परीक्षा येत्या बुधवार, २७ मेपासून सुरू होत आहेत. या परीक्षांसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून ३० हजारहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेले नोकरदार, गृहिणी आणि इतर घटकांसाठी मुक्त विद्यापीठ हा मोठा आधार ठरले आहे.
विद्यापीठाचे नाशिक येथे मुख्यालय असून मुंबई, पुणे, अमरावती, नांदेड, नागपूर, कोल्हापूर आणि संभाजीनगर अशी एकूण ८ विभागीय केंद्रे महाराष्ट्रात कार्यरत आहेत. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. २७ मेपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्हाभरात आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था आणि इतर नियोजन अंतिम टप्प्यात असून, परीक्षा सुरळीत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज झाले आहे












